सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वाडीवस्तीवरील लोकांना इतर समाज व विकासाच्या प्रवाह पातळीत आणण्यासाठी अत्यंत संवदेनशील वृत्ती व निरलस पणे काम करणारी संस्था म्हणून दिशांतर संस्थेची ओळख आहे. वस्तीविकासात त्यांनी निरबाडे खिंडवाडीतील वनवासी बांधवांकरिता केलेलं सर्वांगीण काम पाहण्याजोगं आहे पाच डोंगरपार वसलेल्या आणि पायाभूत सेवासुविधांपासून कोसो दूर असलेल्या कळकवणे खलिफावाडी या नावाने बसलेल्या धनगर समाज बांधवांच्या वस्तीचे आता दिशांतर होत आहे. शिक्षणात ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या भावी पिढीसाठी पूर्ण विचाराअंती धोरणनिश्चिती करून दप्तरासह शैक्षणिक साहित्य वितरण , कनिष्ठ महाविद्यालयातून मोफत पुस्तकपेढी तसेच उच्चशिक्षणासाठी युवा पिढीला शिष्यवृत्ती अशा त्रिसूत्री ने प्रभावी काम सुरु आहे . अन्नसुरक्षितता आणि विषमुक्त्त अन्न … या विचाराने शेतकर्यांसाठी एकरूप झालेला अन्नपूर्णा प्रकल्प कोकण साठी अनमोल म्हणावा लागेल . शेती आतबट्याची, शेती आता परवडत नाही ….. असा सूर गत दोन दशकात अधिक जोर धरू लागला नि दिवसेंदिवस पिकाखालचं क्षेत्र झपाट्यानं आक्रसत गेलं . अशावेळी दिशांतर ने शेतकऱ्यांना नि शेतीला सन्मान देणारा अन्नपूर्णा प्रकल्प गत ३ वर्ष अक्षरशः क्रांती करणारा ठरला आहे. अनेक महिला शेती गटांनी त्यातून केवळ रब्बी हंगामातच लक्षावधी ची उलाढाल केली आहे. तुकड्या तुकड्या च्या शेतीवर सहकारातून शेती ,सामुदायिक शेती , महिलांनी केलेली शेती , सेंद्रियशेती व शेतकऱ्यांनीच पिकवायचं नि शेतकऱ्यांनीच विकायचं अशी दलालमुक्त विक्री व्यवस्थेतूनशेतीची पंचसूत्री त्यांनी उभारलीय . अनेक गावातून हे काम सुरु आहे. बी भातशेतीत भाजावनमुक्त नांगरणीमुक्त शेती यासह हळद , मशरूम , कडधान्य यासह मसाला पिकातून शेतीत अक्षरशः सोन पिकवण्याचं काम शेतकरी करूलागले आहेत. विशेष म्हणजे यात महिलांनी शेतीत केलेलं अन्नपूर्णा प्रकल्पाचं काम इतरजनांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे दिशांतर संस्थेचे हे उपक्रम वा प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन बघितल्याने आम्हां साऱ्यांनी हि अनुभूती आली आहे. आता एवढ्याने समाधानी न होता राष्ट्रविकास व राष्ट्रउभारणीतलं आपलं योगदान अधिक प्रभावी पणे होण्यासाठी दिशांतर कडून आम्हां साऱ्यांना अपॆक्षा आहेत. त्यासाठी दिशांतर ला शुभेच्छा .